आमदार यशोमती ठाकूर यांचा जनता दरबार हाऊसफुल
आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वतीने दर सोमवारी जनता दरबार आयोजित करुन या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा व प्रश्न व समस्या मार्गी लावण्याचा हा जनहिताचा उपक्रम सुरु केला आहे. आज त्याअनुषंगाने आयोजित केलेल्या जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून जेष्ठ नागरिक आदिंचा जनता दरबारात लक्षनिय सहभाग होता.
विविध विभागातील समस्या आणि प्रश्न
जनता दरबारात विविध विभागातील प्रश्न व समस्या नागरिकांनी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाव्दारे मांडल्या. यामध्ये घरकुल योजना, वृद्ध कलावंत पेंशन योजना, विज वितरण, बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, मग्रारोहयो, आदिंचा समावेश होता. समस्या व प्रश्न ऐकून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ भ्रमणध्वनीवरुन या समस्या तातडीने निकाली काढण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
अधिकाऱ्यांना थेट सुचना
जनता दरबारात नागरिकांनी प्रश्न व समस्या सोडविण्याबाबत दिलेल्या निवेदनावरुन जी समस्या तत्काळ सुटू शकले अशा समस्यांबाबत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी तसेच बांधकाम अभियंता, वैद्यकीय अधिकारी यांना लगेचच भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून उपरोक्त समस्या तत्काळ निकाली काढण्याबाबतच्या सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जनता दरबारात महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, मदतनिस व आशा वर्कर यांनी सुद्धा आपल्या समस्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्यापुढे मांडल्यानंतर त्याची त्वरीत दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना यात जातीने लक्ष घालून समस्या दुर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. तसेच या समस्या मंत्रालय स्तरावरच्या आहे त्या समस्या व प्रश्न आपण आगामी विधानसभा अधिवेशनात तारांकीत प्रश्न व लक्षवेधी मांडून त्याचा सरकारला जाब विचारणार असून त्या समस्या निकाली निघाव्या त्यासाठी सरकारला विविध आयुधामार्फत जाब विचारणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
जनहितासाठीच जनता दरबार- आमदार ॲड. यशोमती ठाकूर
तिवसा विधानसभा मतदारसंघात मोर्शी, भातकुली, अमरावती व तिवसा तालुक्यांचा समावेश आहे. हा सर्व भाग संपूर्ण ग्रामीण आहे. त्यामुळे एखाद्या समस्येसाठी नागरिकांना भेटण्यासाठी यायला बऱ्याचदा वेळ होतो, व मतदारसंघातील कामांमुळे त्यांची भेट होवू शकत नाही. त्यामुळे त्यांची भेट व्हावी यासाठी महिन्याच्या दर सोमवारी पुर्णवेळ जनता दरबार आयोजित करण्याचा उपक्रम आपण सुरु केला असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, या निमित्त्याने सर्वांची भेट होते आणि अनेक समस्या मार्गी लागतात. हाच जनहिताचा विचार जनता दरबारामागे असल्याचे त्यांनी सांगितले.