वर्धा जिल्ह्याची कोरोनावर मात सर्व रुग्ण कोरोनामुक्त
वर्धा : आज वर्धा जिल्ह्यातील ४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ग्रीन झोन असलेला जिल्हा १० मे रोजी कोरोनाबाधित जिल्हा म्हणून पुढे आल्यानंतर आज एक महिन्याच्या आत वर्धा जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर जिल्ह्यातील तीन रुग्ण उपचारार्थ असून वर्धा जिल्ह्यातील एक रुग्ण सिकंदराबाद येथे उपचार घेत आहे.
हिंगणघाट तालुक्यातील पती- पत्नी आणि वर्धा तालुक्यातील परिचारिका महिला आणि त्यांची नातेवाईक यांच्यावर अनुक्रमे कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि विनोबा भावे रुग्णालय सावंगी येथे उपचार सुरू होते. चारही रुग्ण मुंबई मधून परत आलेलं आहेत. त्यांना शासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार कोरोना मुक्त झाल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच त्यांना पुढे ७ दिवस गृह विलगिकरणात राहण्यास सांगण्यात आले. यावेळी दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस यांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्यात.
जिल्ह्यात एकूण ८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. यामध्ये आर्वी २ , आष्टी १, हिंगणघाट २ वर्धा ३ या तालुक्यातील रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी आर्वी मधील एका रुग्णाचा मृत्यूनंतर कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता, तर वर्धा तालुक्यातील एक रुग्ण सिकंदाराबाद येथे उपचार घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६ कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले.
तर इतर जिल्ह्यातील उपचारार्थ दाखल असलेल्या १२ रुग्णांपैकी ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील वाशिम १ आणि धामणगाव रेल्वे १ अशा २ रुग्णांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला.