पक्ष सोडणारे चोर किंवा डरपोक- ॲड. यशोमती ठाकूर यांचा अमरावतीत घणाघात
यावेळी बोलताना ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे न्याय मिळेपर्यंत आपल्याला प्रत्येक घराघरात गेलं पाहिजे. प्रत्येक घराघरात सर्वधर्मसमभावाचा दिवा लावला पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात तिरंगा फडकवला पाहिजे. आज काही लोक हे केवळ विष पेरण्याचं काम करीत आहेत मात्र समाजात त्यांनी पेरलेलं विष कमी करण्याचे काम आपलं आहे. त्यांना जितकं विष पेरायचा आहे पेरू द्या मात्र आपल्याला घराघरात प्रेमच द्यायचा आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने आम्हाला असा कार्यक्रम द्यावा ज्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाप्रती सर्वधर्मसमभावाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हायला पाहिजे. असे ॲड. ठाकूर म्हणाल्या.
पक्षातील एक माजी केंद्रीय राज्यमंत्री नुकतेच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत मात्र व्यक्ती तेव्हाच पक्ष सोडून जाते जेव्हा एक तर ती खूप डरपोक असते किंवा तिच्या मनात चोर असतो. अन्यथा सर्वधर्मसमभाव मांडणाऱ्या पक्षातून कोणीही जाणार नाही. आम्ही सर्व कार्यकर्ते ही ग्वाही देतो की, आम्ही कधीही पक्ष सोडून जाणार नाही, असे त्यांनी यावेळी ठामपणे निक्षून सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जर वातावरण पाहत असाल तर अमरावतीमध्ये पक्षासाठी अतिशय चांगले वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हेच वातावरण यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या ठिकाणी सुद्धा आहे. जर आपण सर्व एकसंघपणे एकत्र आलो आणि एक दिलाने काम केलं तर निश्चितच अकोल्यामध्ये सुद्धा हेच वातावरण दिसायला हरकत नाही, असा ठाम विश्वास यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
हीच पक्षशिस्त आणि पक्षनिष्ठा
काँग्रेसची विभागीय आढावा बैठक आज अमरावती पार पडली. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते व्यासपीठावरून संबोधित करीत होते. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे व्यासपीठावर आगमन झाले. मात्र, त्यांना बसण्यासाठी खुर्ची रिकामी नव्हती. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता ॲड. यशोमती ठाकूर व्यासपीठावरून खाली उतरल्या. स्थानिक आमदार आणि काँग्रेसच्या कार्यकारी समितीची सदस्य असूनही ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना व्यासपीठावर विराजमान होता आले. वास्तविक व्यासपीठावर बसण्यासाठी राजकीय नेत्यांची कशी घालमेल सुरू असते हे आपण पाहतो. पण इथेच काँग्रेसची वैभवशाली परंपरा, पक्षशिस्त आणि पक्षनिष्ठा दिसून येते. अन्य पक्षात ज्येष्ठ नेत्यांची वर्णी मार्गदर्शक म्हणून लावत त्यांना अडगळीत टाकले जात असताना काँग्रेस पक्षात मात्र ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन शिरोधार्य मानले जाते हेच ॲड. ठाकूर यांनी दाखवून दिले..
